– शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : उद्योग विरहीत जिल्हा असलेल्या गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्ते व राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या गरीब फूटपाथ धारकांची दुकाने ‘अतिक्रमण हटाव’ कारवाईच्या नावाने हटविण्यात येत आहेत. हि दुकाने हटविण्यापूर्वी प्रशासन फुटपाथ धारकांना पर्यायी जागा देणार आहे का ? असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला.
अतिक्रमण हटाव कारवाईच्या नावाने फुटपाथ धारकांना व्यवसायापासून वंचित करु नये, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी संघर्ष उभा केला होता तो आज या माध्यमातून विधिमंडळात पोहचला असून फुटपाथ धारकांना दिर्घकालीन दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
आमदार भाई जयंत पाटील यांनी लेखी उपस्थित केलेल्या प्रश्नांत म्हटले आहे की, गडचिरोली शहरातील चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्गालगत सर्वीस रोड तयार करण्यात येणार आहे काय ? आणि त्यासाठी मोठ्या व पक्क्या इमारती हटविण्यात येत नाही तोपर्यंत हटाव कारवाई थांबवून गरीब फुटपाथधारकांच्या दुकानांना संरक्षण देण्यात येणार आहे काय?
तसेच नगर परिषद आणि शहरातील शासकीय जागांवर दुकान गाळे बांधण्यात येणार आहेत काय ? आणि ती फुटपाथधारकांना किरायाने देण्यात देवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात येणार आहेत काय ? असा लेखी प्रश्नही आमदार भाई जयंत पाटील यांनी उपस्थित केले.




