गडचिरोली जिल्ह्याच्या समस्यांना घेऊन विधानमंडळात प्रश्न उपस्थित करा

60

– अंबादास दानवे, नानाभाऊ पटोले यांच्याकडे महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्ग व मागास जिल्हा आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्याचा अजूनही विकास झालेला नाही. जिल्ह्यात वर्तमान परिस्थितीत महाविकास आघाडीचा एकही लोकप्रतिनिधी नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी च्या उदासीनतेमुळे जनतेच्या प्रश्नांना बगल दिल्या जाते. सरकारच्या मनमर्जीप्रमाणे कारभार केला जात असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्याकरिता व विधिमंडळाच्या सभागृहात प्रश्न आणि विविध मागण्या उपस्थित करण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्या सांगितल्या व समस्या सोडविण्याकरिता आणि सभागृहात आवाज उठविण्यासाठी विनंती केली.

यामध्ये प्रामुख्याने सुरजागड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील झालेली रस्त्यांची दुरावस्था व त्यामुळे होत असलेले दिवसेंदिवस अपघात दूर करण्याकरिता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरजागड खदानाची वाहतूक पूर्णतः बंद करणे, तलाठी आणि वनरक्षक भरतीत जिल्ह्यातील गैर आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाला असून तो दूर करण्याकरिता वनरक्षक आणि तलाठी भरतीत गैरआदिवासीकरीता अधिक जागा वाढवून देण्यात याव्या, सरकारने नुकताच जाहीर केलेल्या शासन निर्णयात निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर कामावर घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार पात्र तरुणांना प्रथम प्राधान्याने संधी देण्यात यावी, जिल्ह्यातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी व स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी देण्यात यावी, मेडिगट्टा धरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर्षी तसे होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, मागील एक वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, अधिकाऱ्यांच्या मन मर्जीने कारभार चालवला जात आहे, याकडेही सरकारचे लक्ष केंद्रित करण्याची मागणी करण्यात आली आहे.