बंगाली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध : खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बंगाली समाज 40 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात वहिवाट करीत आहे. मात्र त्यांना वनजमिनीचे पट्टे देताना 75 वर्षाची अट घातलेली आहे. तसेच अन्य कागदपत्रे घेतानाही त्यांना अनेक अडचणी येत आहेत. यात तोडगा काढण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू व बंगाली बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे आयोजित बंगाली समाजाच्या छोटेखानी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, अखिल भारतीय बंगाली समाजाचे अध्यक्ष दीपकजी हलधर, इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य बेपारी, चामोशी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, माजी उपसभापती आकुलीताई बिश्वास, सतीश राय व बंगाली समाज बांधव उपस्थित होते.