– डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत देसाईगंज येथे भाजपाची बैठक संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे, जो संघटन लोकशाहीला घेऊन आणि धरून चालतो. बुथ, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल, प्रदेश ते राष्ट्रीय स्तरावर पक्षाची रचना मजबूत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वेळोवेळी पदाची जबाबदारी दिली जाते. हे पद सन्मानाचे असून, त्या जबाबदारीचे कार्यकर्त्यांनी न्यायाने पालन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी केले.
आदर्श महाविद्यालय वडसा (देसाईगंज) येथे आयोजित गडचिरोली जिल्हा भाजपा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे डॉ. कोठेकर म्हणाले, पद हे कायमस्वरूपी नसते, पण त्या पदावर असताना त्याचा उपयोग सोने करण्यासारखा की कोळसा करण्यासारखा हे त्या पदाधिकाऱ्यावर अवलंबून असते. दिलेल्या जबाबदारीस वेळ देणे, पक्षाच्या कामाला प्राधान्य देणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षाने रक्षाबंधन कार्यक्रम, हर घर तिरंगा अभियान आणि विभाजन विभिषिका स्मृती दिनाचे आयोजन ठरवले आहे. हे सर्व कार्यक्रम नियोजनबद्धपणे जिल्हाभर व प्रत्येक मंडल पातळीवर पार पडावेत, असेही ते म्हणाले.
या जिल्हा बैठकीस माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, तालुका – मंडल पदाधिकारी आणि आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे तर संचालन जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे यांनी केले.







