– शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हादरले आरोग्य प्रशासन
– आरोग्यसेवा सुरळीत न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षाला कुलूप ठोकणार ; अरविंद कात्रटवार यांचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांअभावी ढासळली असून रूग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. सदर उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून सेवा तातडीने सुरळीत करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत धडक दिली. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आरोग्य प्रशासन हादरून गेले. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत ढासळलेल्या आरोग्यसेवकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, अमिर्झा आरोग्य उपकेंद्रात स्थायी दोन आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व अन्य पदे रिक्त आहेत. आरोग्य उपकेंद्रांतर्गत अमिर्झा, भिकारमौशी आणि मौशीचक गावे समाविष्ट आहेत. येथील आरोग्य सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली असून रूग्णांना आरोग्यसेवापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी रूग्णांना उन्हाळयाच्या कडक उन्हात गडचिरोली येथे धाव घेऊन उपचार घ्यावे लागते. यामुळे रूग्णांचा वेळ आणि पैसा खर्च होत असून शारीरिक त्रासाचा सामना सुध्दा करावा लागत आहे.
धुंडेशिवनी येथे कार्यरत कंत्राटी आरोग्यसेविकेची अमिर्झा येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. सेवा बजाविताना संबंधित आरोग्य सेविकेची दमछाक होत असून रूग्णांना योग्य ती सेवा सुध्दा मिळत नाही. गडचिरोली तालुक्यातील आरोग्य सेवेची विदारक स्थिती असेल तर दुर्गम भागातील आरोग्य सेवेची काय स्थिती असेल यांची कल्पना न केलेली बरी. जिल्हयातील आरोग्य सेवेकडे शासन व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

अमिर्झा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी आणि गोरगरीब रूणांना आरोग्य सेवेचा लाभ द्यावा, अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कक्षाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आरोग्य विभागाला दिला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, तेजस धंदरे, रंजीत वलादे, सचिन मडावी, मधुकर बावणे, सुरज वलादे, संदिप नरुले, मनोहर निलेकार, विशाल गुरनुले, जितेंद्र निकोडे, राजेंद्र मेश्राम, गणेश ठाकरे, अमोल चौधरी, शुभम चंद्रगिरे, आरीफ ढवळे, साहिल कारेते, रमेश आवारी, फाल्गुन समर्थ, अमर सोरते, समिर राऊत, अक्षय समर्थ, शुभम अंबादे, चुडाराम राऊत, दिपक राऊत, अजित आजबले, त्रिशुल ठाकरे, वेदांत कस्तुरे, सुरज वाघाडे, रमेश आवारी, तुमदेव आवारी, सुनिल कोसमशिले, तुषार म्हशाखेत्री, विलास ढोलणे, स्वप्निल मांडोलकर, राहुल सावरकर, विनोद पातळ, पुरुषोत्तम डोईजड, प्रणय सोरते, राजु भैसारे, पंकज राऊत, तुषार ठाकरे, साहिल निकुरे, आशिष मुरतेली, समिर पिंपळे, साहिल बारापात्रे, प्रभाकर मेश्राम, आर्यन बांबोळे, प्रणय बोरकर, लोकेश ठाकरे, संकेत बोरकर, सचिन मंगर, साहिल बांबोळे, हिमांशु चौधरी, सुमित डोंगरे, अनिकेत मेश्राम, प्रफुल बांबोळे, कुणाल म्हस्के, अजिंक्य नगराळे, रवि आवारी, रोहित कुसनाके, शुभम पदा, मोहित कोसरे, नविन आवारी आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.