– जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आपल्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती, वाढलेली बेरोजगारी, रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी मी लढणार असल्याचं संकल्प करीत माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज २८ ऑक्टोबर रोजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारोंच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढत ‘हम भी किसींसे कम नहीं’ हे दाखवून दिले. सुरुवातीला त्यांनी कै. राजे सत्यवानराव महाराज यांच्या स्मृती समाधीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर कै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत त्याच चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी राजामाता राणी रुख्मिणी देवी, युवा नेते अवधेशराव बाबा आत्राम, विक्की बाबा आत्राम, राजे समर्थक आणि पाचही तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यावर तोफ डागली. गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मोठा गेम केला. पैशाने तिकीट विकत घेऊन पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असले तरी ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात तुम्ही कितीही फटाके फोडा २३ तारखेला आम्ही फटाके फोडणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. एका खाजगी कंपनीच्या मांडीवर बसून पैशाने आणि माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटत असेल तर जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकवणार आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असून तुमच्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विरोधकांना योग्य धडा शिकवा, असे त्यांनी आवाहन त्यांनी केले. यावेळी राजेंचा भाषण ऐकून त्यांच्या समर्थनार्थ एकच जल्लोष केला.
दरम्यान कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातून ढोल ताश्यांच्या गजरात आणि आदिवासी पारंपरिक नृत्याने भव्य शक्ती प्रदर्शन करत पोलीस स्टेशन समोर पर्यंत रॅली काढण्यात आली. त्यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात जल्लोषाने ‘राजे साहब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ चे नारे देत समर्थन जाहीर केले.
जनता हीच माझी तिकीट
मला पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत. माझ्यासाठी कुठलाही पक्ष नको आणि पक्षाचा चिन्हही नको. माझी जनता हीच माझी तिकीट आहे. जनता आशीर्वाद दिल्यास मला विधिमंडळ गाठता येणार आहे. विद्यमान मंत्र्यांनी कितीही पैसा, पॉवर, कार्यकर्त्यांना धमक्या देऊन मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ‘मै झुकेगा नही साला’ असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक प्रकारचा चॅलेंज दिला आहे.





