Home गडचिरोली राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी

राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी

204

– गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २७ सप्टेंबर २०२५ रोजी न्यूज 18 केरळ वाहिनीवरील थेट चर्चासत्रात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत प्रवक्ते पिंटू महादेव यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याविरुद्ध दिलेली उघडपणे मृत्यूची धमकी “राहुल गांधी यांच्या छातीत गोळी झाडली जाईल” या वक्तव्याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

ही धक्कादायक व जाणूनबुजून दिलेली आणि थेट हत्या करण्याची धमकी खासगी पातळीवर दिली गेलेली नसून सार्वजनिक मंचावर, संपूर्ण देशासमोर, थेट प्रक्षेपित चर्चासत्रात दिली गेली आहे. त्यामुळे या कृतीचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. हे केवळ धमकीपर विधान नसून थेट गुन्हेगारी स्वरूपाची भीती निर्माण करणारा प्रकार असून तो लोकशाही व सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण करणारा आहे. या विधानातून भाजपने द्वेषराजकारणाच्या टोकाला नेण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते. हे केवळ राजकीय वक्तव्य नसून, भारताच्या तरुणांचा आवाज असलेल्या आणि संविधानिक पद भूषवणाऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या हत्येचे खुले आवाहन असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

राहुलजी गांधी यांना आधीपासूनच उच्चस्तरीय सुरक्षा धोका आहे, हे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) वारंवार दिलेल्या अहवालांवरून स्पष्ट झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर, सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता जर थेट प्रसारणात “राहुल गांधी यांच्या छातीत गोळी झाडली जाईल” असे म्हणतो, तर ते फक्त एक राजकीय वक्तव्य न राहता, ही गंभीर गुन्हेगारी कटाची सुरुवात मानली पाहिजे. हा प्रसारित धमकीवजा गुन्हा उघड आणि स्पष्ट आहे. जर या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसतील, तर ते गुन्ह्यात निष्क्रिय सहभाग मानले जाईल, असे म्हटले आहे.

या प्रसंगावरून असा प्रश्न उपस्थित होतो की, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या या धमक्यांना पक्षाचे शीर्ष नेते, अगदी पंतप्रधानांनीही संमती दिली आहे का? जर कोणतीही कारवाई केली गेली नाही, तर सामान्य जनतेला असं वाटेल की अशा प्रकारच्या धमक्या हे सरकारचे मौन समर्थन प्राप्त करत आहेत. राहुल गांधी यांना धमकी देणे म्हणजे लाखो भारतीयांचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न होय. हे केवळ एक व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरच केलेले आक्रमण आहे. अशा निर्ढावलेल्या धमक्यांना आम्ही चुप बसून स्वीकारणार नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयीन लढाई लढू. राहुल गांधी हे फक्त काँग्रेसचे नेते नसून, देशाच्या तरुणांचा आणि संविधानाचा आवाज आहेत. त्यांच्याविरुद्ध दिलेली धमकी म्हणजे भारताच्या लोकशाही मूल्यांवरच झालेला आघात असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देताना गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, शहराध्यक्ष सतीश विधाते, शहराध्यक्ष विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, अनिकेत राऊत, प्रफुल आंबोरकर, मिलिंद बारसागडे, रजनीकांत मोडघरे, विपुल येलटीवार, गौरव येनप्रेडीवार, लालाजी सातपुते, आशिष वाढई, चैतन्य बोलूवार, तन्मय वडेट्टीवार, क्रिश संगीडवार, प्रफुल पाल आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!