शेतकरी अजय टोप्पोची आत्महत्या प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे : शेतकरी कामगार पक्ष आणि मृतकाच्या कुटुंबियांचा आरोप

63

– शासनाने न्याय देण्याची केली पत्रकार परिषदेतून मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील शेतकरी अजय टोप्पो हे जबरानजोतधारक शेतकरी असून ते गेल्या चार पाच दशकापासून सदर जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतू सुरजागड लोह खाणीतून वाहून येणाऱ्या गाळामुळे त्यांच्या धान पिकाचे पुर्णपणे नुकसान झाले. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे दाद मागून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी सदर शेतकऱ्याला दिलासा न देता उलट त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अजय टोप्पो याने नैराश्येतून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला प्रशासनाच्या असंवेदनशीलता कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्ष व मृतकाच्या कुटुंबियांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

एट्टापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील उराव आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो (३८) यांनी  ३१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या शेतात सुरजागड लोहखाणीतून पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची नुकसान झाल्याने मौजा मंगेर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याकडे न्याय देण्याची मागणी करुनही न्याय न देता जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्हाला आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र देवू शकत नाही, तुम्हाला आज ना उद्या ही जमीन सोडून द्यावी लागणार आहे, जमिनीचे काहीच कागदपत्रे नसल्याने तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. असा आरोपही मृतकाच्या कुटुंबियांनी व शेतकरी कामगार पक्षाने केला.

सदरच्या आत्महत्या या जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झालेल्या आहेत. मात्र पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून सदर आत्महत्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीरपणे दखल घेऊन निष्पक्षपणे चौकशी व्हावी व जिल्हाधिकारी संजय मीणा आणि इतर दोषींवर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षााचे सरचिटणीस रामदास जराते, सुरजागड पारंपारिक इलाका प्रमुख तथा माजी जि.प.सदस्य सैनू गोटा, ऍड. लालसू नागोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, मृतक अजय टोप्पो यांचे वडील, पत्नी आणि भाऊ उपस्थित होते.