पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचवा : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

58

– ब्रम्हपुरी येथे काँग्रेसची तालुका आढावा बैठक संपन्न

विदर्भ कांती न्यूज

ब्रम्हपुरी : देशात सर्वत्र महागाई, बेरोजगारी, धर्मांधता पसरवून अराजकता माजविण्याचे काम सुरू आहे. याचा विरोध म्हणून नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल काँग्रेस ला कौल देणारा असल्याचे भाकीत वृत्त वाहिन्या देत आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांना समर्थपणे पुढे जाण्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचवा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटी, सर्व गावांतील ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष व सचिव यांच्या आढावा बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या आढावा बैठकीला काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, सेवादलाचे गुड्डेवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, माजी जि. प. सदस्या स्मिताताई पारधी, प्रदेश काँग्रेस प्रवक्ता बालाजी गाडे, माजी पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं. स. सभापती नेताजी मेश्राम, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, माजी न. प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, नगरसेवक ॲड. बाला शुक्ला, बाजार समितीच्या उपसभापती सुनिताताई तिडके, नगरसेविका सरिताताई पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका वनीताताई अलगदेवे, माजी जि. प. सदस्या भावनाताई ईरपाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव डि. के. मेश्राम यांच्यासह अन्य काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या मुल मंत्राचा वापर करून सत्ता काबीज केली. सत्तेच्या मदमस्तीत व्यापारी हित जोपासत देशातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचा छळ केल्या जात आहे. धर्मांधतेच्या नावावर जातीभेद निर्माण करून जाती जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. आता देशातील मतदार जागृत झाला असून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट दिसून येत आहे. तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आगामी निवडणुकांमध्ये भक्कम बाजूने उभे राहण्याकरिता व काँग्रेस उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी सर्व शक्तीनिशी कंबर कसून पक्षाची संघटनात्मक बांधणी करून पक्षाचे विचार तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी ब्रह्मपुरी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सचिव, बूथ कमिटीचे सर्व सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.