– राजाराम (खांदला), जांभिया, नागुलवाडी, हालेवारा, मडवेली, इरडुम्मे, बोटनपुंडी, कोटापल्ली ग्रापं निवडणूक कॉर्नरसभा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील अत्यंत दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यातील राजाराम (खांदला), एटापल्ली तालुक्यातील जांभिया, नागुलवाडी, हालेवारा व भामरागड तालुक्यातील बोटनपुंडी, इरडुम्मे, मडवेली तर सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विविध गावांचा झंझावती प्रचार दौरा केला. त्यावेळी अनेक गावांमध्ये गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे स्वागत केले. राजे साहेब आपल्या गावात आले हा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्या सारखा होता.
आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी राजेंनी अनेक कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी परिसरातील गावकऱ्यांना संबोधित करताना राजे साहेब म्हणाले, आपण सर्वांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधकांच्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या उमेदवार यांना बहुमताने निवडून द्या. येणाऱ्या काळात तुमच्या गावातील व परिसरातील सर्व समस्या, तुमच्या अडचणी दूर केल्या जाणार. यासाठी सर्वांनी जागृत झाले पाहिजे. आज महाराष्ट्रात आणि देशात आपल्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण होणार नाही. मी आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपला सरपंच जर असेल तसेच ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य गण आपले असतील तर आपण गावातील नाली असो, रस्ता, वीज आणि पाण्याची ज्या समस्या आहेत त्या लवकर दूर होतील आणि आपला विकास होईल. यावेळी ग्रामपंचायत निवडणूकमध्ये थेट सरपंचपद निवड असल्याने तुम्ही चांगल्या व्यक्तीला निवडून द्याल आणि रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वांनी मतदान केंद्रात जाऊन आपलं बहुमुल्य मत द्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गणांना बहुमताने निवडून आणणार असा विश्वास मला तुमच्यावर आहे, असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदाचे उमेदवार आणि सदस्य पदाचे उमेदवार, प्रतिष्ठित नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.







