जहाज नक्षलवादी तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने महाराष्ट्रासह सीमावर्ती राज्यात शांतता प्रस्थापित होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

136

– गृहमंत्र्यांनी केले पोलीस जवानांचे अभिनंदन

गडचिरोली : गडचिरोलीतील ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश होता. तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने महाराष्ट्रासह सीमावर्ती राज्यात शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. जहाज नक्षली तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी चकमकीत ठार झाले हे गडचिरोली पोलिसांचे अभूतपूर्व यश असल्याचेे ते म्हणाले. या कामगिरीबद्दल गडचिरोलीतील पोलीस अधिकार्‍यांचे आणि सी-६० दलाच्या जवानांचे अभिनंदन केले. या पत्रपरिषदेला पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.