– जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा – मित्रांची जोड, प्रशिक्षणास सुरूवात
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १३ डिसेंबर २०२२ : प्रशासन तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या स्थितीत मदत करतात. कोणताही प्रकारचा स्वहेतू किंवा प्रसिद्धी दूर ठेवून पूरस्थितीत लोकांचे जीव वाचविले जातात. त्याचप्रकारे तुम्ही आपदा-मित्र म्हणून काम करताना स्वहेतू मनात न ठेवता काम करावे. यातूनच खऱ्याअर्थाने सेवा होत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात केले. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारे महाराष्ट्र राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा-मित्र प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. यावेळी आपदा मित्रांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनी घेवून स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनामध्ये सहभागी होवून प्रशासनासह आपणही मोलाची भूमिका पार पाडावी. विशेषता जिल्ह्यातील पूरस्थिती, वनवे, भूकंप, अपघात यावेळी आपदा मित्रांनी आपली भूमिका पार पाडावी. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसिलदार महेंद्र गणवीर, प्राचार्या हेमलता चौधरी, कार्यकारी अभियंता श्री.उसेंडी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी संजय जठार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हा सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट राज्य तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा स्तरावर राबविण्यात येत आहे. शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली येथे 13 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये प्रथम बँचचे सुरुवात आज झाली.
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 13 डिसेंबर ते 27 फेब्रुवारीपर्यंत 6 टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण एकुण जिल्ह्यातील 300 विशेषतः नदीकाठी असणाऱ्या गावातील आपदा मित्रांना दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण 12 दिवसांचे निवासी स्वरुपाचे आहे. प्रत्येकी 50 स्वंयसेवकाची 1 बँच या प्रमाणे 6 बँच मध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांना जिल्हा प्रशासनाकडून आपदा किट, प्रमाणपत्र तसेच आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांना शासनाकडुन 5 लक्ष रुपये चा 3 वर्षांकरिता विमा काढण्यात येणार आहे. सदरचा विमा पुढेही वाढविण्यात येईल. सदर प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्यांना स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनमध्ये फर्स्ट रिस्पाडंट ही भुमिका पार पाडून समूह तसेच प्रशासनाशीसंपर्क समन्वय साधायचा आहे, जेणेकरुन आपत्तीची तिव्रता कमी करण्यात यश येईल.