Home गडचिरोली गुन्हा नोंद करण्यास विलंब का..? सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल

गुन्हा नोंद करण्यास विलंब का..? सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा सवाल

127
Oplus_16908288

– राष्ट्रीय महामार्गावरील अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (आलापल्ली ते सिरोंचा) च्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात झालेल्या अपघातानंतर, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी) आणि रस्ते कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी गडचिरोली येथील पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला आहे.

अपघाताचे स्वरूप आणि कारण
सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर २४ ऑक्टोबर २०२५ रोजी हा अपघात झाला होता. या भीषण अपघातामध्ये पेंटीपाका येथील एका ट्रॅक्टर चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांनी रस्त्याचे काम सुरू असताना जनतेच्या जीविताची हानी होऊ नये यासाठी कोणतीही काळजी घेतली नाही आणि नियमांचे पालन केले नाही. मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक जनतेला आपल्या जीवाला मुकावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक, सूचना फलक किंवा सावधान फलक न लावल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
अर्जदारांनी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी घटनास्थळी (बामणी ब्रीज) भेट दिली असता रस्त्याचे काम सुरू असल्याचे आणि कंत्राटदाराच्या गंभीर निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
अर्जदार संतोष रामचंद्र ताटीकोंडावर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग, मुंबई) आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची विनंती संबंधित पोलीस स्टेशनकडे केली होती. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू आहे असे सांगितल्याने गुन्हा नोंद करण्यास विलंब होत आहे. या विलंबामुळे, अर्जदारांनी गडचिरोली पोलिस अधीक्षकांना सदर घटनेची तातडीने चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!