विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मागील पाच-सहा दिवसात गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीने आणि पूरजन्य परिस्थितीमुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. क्षेत्रातील कितीतरी हेक्टर शेतकऱ्यांच्या जमीनी पुराच्या पाण्याखाली गेली आहे. सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकरी शेतमजुरांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी शासनाकडे केली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद पडल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. गडचिरोली सारख्या शहरात अनेकांच्या दुकानात, घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी धानोरा, गडचिरोली, चामोर्शी या तीन तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.







