विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : मंडल आयोगाच्या विरोधात भाजपने पूर्वी कुमंडल यात्रा काढून ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली होती हे देशाला माहिती आहे. आज ओबीसींसाठी खऱ्याअर्थाने न्याय हवा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंडल यात्रा काढावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
नागपूर येथून ९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झालेली मंडल यात्रा बुधवारी गडचिरोली जिल्हा मुख्यालयी दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा जिल्ह्यात पोहचताच स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तसेच ३५८ तालुक्यांतील गावागावात पोहचून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करणार आहे. गडचिरोलीत या यात्रेचे स्वागत जिल्ह्यातील महिला भगिनींनी “एक राखी मंडल के लिये” असा नारा देत, सहभागी बांधवांच्या हातावर राखी बांधून केले. या उपक्रमाने समाजातील एकात्मतेचा व न्याय हक्कासाठीच्या भावनेचा संदेश देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, जिल्हा उपाध्यक्ष नईन शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







