Home गडचिरोली मदतीचा हात पोहचला लाखो जनतेपर्यंत

मदतीचा हात पोहचला लाखो जनतेपर्यंत

100

– सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केवळ लोकसेवेच्या भावनेतून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुरू केलेला ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम अवघ्या अडीच वर्षांत एक लाख लोकांपर्यंत पोहचला आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कनिष्ठ कन्या तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी अडीच वर्षांपूर्वी नवरात्रीच्या शुर्भ पर्वावर ‘एक हात मदतीचा’ हा लोककल्याणकारी उपक्रम नि:स्वार्थ भावनेने सुरू केला आहे. सुरुवातीला अहेरी उपविभागात लोकप्रिय झालेल्या या उपक्रमाने हळूहळू गडचिरोलीपर्यंत व्याप्ती वाढली. तनुश्री आत्राम यांनी गरजू नागरिकांना विनामूल्य आभा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र अशी महत्वाची कागदपत्रे काढून देण्यासाठी मदत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पाहतापाहता ही माहिती दूरदूरपर्यंत पोहचली आणि आता स्वत:हून नागरिक त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडीअडचणी सांगू लागले आहेत. एवढेच नाही तर गावात येण्याची विनंतीही करू लागले आहेत. त्यानुसार तनुश्री आत्राम गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधू लागल्या.

यासंदर्भात तनुश्री आत्राम यांनी ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम घेऊन डिजीटल मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधला. महत्वाची कागदपत्रे काढून देताना महिला, युवक, युवती, शेतकरी, मजूर हे आपल्या समस्या सांगू लागले आहेत. त्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टे मिळवून देणे, विश्वकर्मा योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशिन, कामगार योजनेंतर्गत कीट, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देणे अशी कामेही आपण करीत आहोत. या कामांच्या माध्यमातून आपण जवळपास एक लाख लोकांशी जोडल्या गेलो असल्याचे तनुश्री आत्राम यांनी सांगितले आहे.

अलीकडे अनेक गावांना पूर आल्याने नागरिकांचे नुकसान झाले. काही जणांचे घर क्षतीग्रस्त झाले. त्यांनाही आपण मदतीचा हात दिला. एखादे काम झाल्यानंतर गोरगरीब नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना मोठे समाधान मिळते, असे तनुश्री आत्राम यांनी सांगितले. निवडणुका येतील आणि जातील, पण आपले लोकसेवेचे काम अविरतपणे सुरू राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

error: Content is protected !!