लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली : राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

110

विदर्भ क्रांती न्यूज

 गडचिरोली : कोविड संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढल्यामुळेच ओमायक्रॉनसारख्या नव्या विषाणूची तीव्रता कमी झाली असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य विभागाबरोबर झालेल्या बैठकीत व्यक्त केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे आले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कोविड परिस्थिती व लसीकरणाबाबतची माहिती त्यांना दिली. लसीकरणात शहरी व ग्रामीण लसीकरणाची टक्केवारी पाहून त्यानुसार मोहिमा राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी जिल्हयातील आरोग्य सुविधा व विविध साथरोगांबाबत राज्यमंत्री महोदयांना माहिती सादर केली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यासह अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कोविड संसर्गासह राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य सुविधा, दवाखान्यांचे फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट व स्ट्रक्चरल ऑडीटबाबत माहिती घेतली. जिल्हयातील अहेरी येथील महिला रूग्णालयाच्या पुढील निधीबाबत डॉ. रूडे यांनी राज्यस्तरावरून निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी येणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सदर विषय घेणार असल्याचे सांगितले.

लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची 31 व्या क्रमांकावरून 16 क्रमांकावर झेप

राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गडचिरोली जिल्हयातील वाढत्या लसीकरणावर प्रशासनाचे अभिनंदन केले. गडचिरोली जिल्हा सुरूवातीला लसीकरणामध्ये राज्यस्तरावर मागे होता. यामध्ये मागील दोन महिन्यात चांगला वेग घेत 31 व्या क्रमांकावरून 16 क्रमांकावर झेप घेतली. याबाबत जिल्हयात राबविलेल्या उपक्रमांबाबतची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी त्यांना दिली. घरोघरी लसीकरण मोहिम राबविल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे राज्यमंत्री यांनी नमूद करत सर्वांचे अभिनंदन यावेळी केले.