तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बेकायदेशीर व लोकशाहीस घातक : आशीष पिपरे

86

– चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे व अशोक धोडरे यांनी दिले मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली/ २९ नोव्हेंबर २०२२ : 

चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बेकायदेशीर व लोकशाहीस घातक असल्याचा आरोप चामोर्शीचे नगरसेवक आशीष पिपरे व अशोक धोडरे यांनी प्रसिद्ध पत्रकातून केला आहे. या खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध प्रक्रियेला नगरसेवक आशीष पिपरे व अशोक धोडरे यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे म्हटले आहे.

मंत्रालय मुंबई येथे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक आशीष पिपरे व रमेश अधिकारी यांनी भेट घेऊन झालेला संपूर्ण गैरप्रकार कागदोपत्री पुरावानिशी अवगत केला व सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट मंत्रालयातून राज्याचे सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे व पणन सचिव अनुप कुमार यादव यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे प्रसिद्ध पत्रकात पिपरे म्हटले आहे.
गेल्या तीन निवडणुकांपासून चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक व संचालक मंडळ संस्थेच्या सभासदांना कुठलीही नोटीस, सूचना व माहिती न देता नियमबाह्य पद्धतीने वार्षिक आमसभा घेऊन व त्या आमसभेत मनमानी पद्धतीने ठराव मंजूर करून एकहाती सत्ता स्थापन करून विरोधकांना संपूर्णपणे संस्थेतून बेदखल करून आपल्या मर्जीच्या सभासद उमेदवारांना बिनविरोध निवडून आणून संस्थेत अनेक आर्थिक गैरव्यवहार करणे, हुकुमशाही निर्माण करून अनेक घोटाळे करण्याचे कारस्थान काही प्रस्थापितांकडून केले जात आहे. याआधी या विरोधात चामोर्शी वासिय जनतेने संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेऊन अन्यायग्रस्त सभासदांनी काढलेल्या जाहीर विराट मोर्चाला भरभरून समर्थन दिले व सदर प्रकार राज्य सरकारला अवगत केले  याची गंभीर दखल सहकार मंत्रालयाने घेतलेली आहे. त्यामुळे चामोर्शी येथील प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करून पुढील आंदोलनाची दिशा व रूपरेषा ठरविणार व तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सभासद बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा अविरत सुरू ठेवणार, अशी ग्वाही नगरसेवक आशीष पिपरे, रमेश अधिकारी, अशोक धोडरे, ज्येष्ठ नेते मानिकराव तुरे व इतर सहभागी लोकांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.