अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या

52

– भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावारांची मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश कोलावार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आले.

सदर निवेदनातून कोलावार म्हणाले की, महाराष्ट्र व प्रामुख्याने विदर्भात सर्वञ गत ७ ते ८ दिवसांंपासून संततधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठची शेती वाहून गेली. हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने भात, सोयाबीन, कापूस व तुरीचे पीक यांसारख्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.शेतक-यांसमोर अतिवृष्टीचे हे नवे अस्मानी संकट निर्माण होऊन शेतकरी हतबल झाला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला पुन्हा खंबीरपणे उभे रहायला प्रशासनांनी मदतीचे हात उचलण्याची वेळ आली आहे. तरी प्रशासनाने अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या हानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतक-यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महेश कोलावार यांनी यावेळी केली.