किष्टापूर (दौडगीर) येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्मारक बनविणार : राजे अम्ब्रिशराव आत्राम

42

– अहेरी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात ६१ आदिवासी जोडपे विवाहबद्ध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीचे औचित्य साधून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी येथील ऐतिहासिक हॉकी ग्राऊंड येथे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या दिमाखदार विवाह सोहळ्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील ६१ आदिवासी जोड़पे विवाहबद्ध झाले. तसेच याप्रसंगी नवनिर्मित सल्ला गांगराचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांतून आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी होती.
याप्रसंगी उद्घाटक म्हणूून बोलताना राजे अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले, शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी अन्याय, अत्याचार, असत्य याविरुद्ध सामान्य जनतेसाठी इंग्रजांशी लढा देत आपल्या अतिशय कमी वयात आपल्या प्राणांची आहुती दिली होती हे आदिवासी समाजाला कदापी विसरता येणार नाही. त्यांचे त्याग, बलिदान आणि वैभवशाली इतिहासाचे भावी पिढीला स्मरण व्हावे यासाठी वीर बाबुराव शेडमाके यांचे जन्मगाव अहेरी तालुक्यातील किष्टापूर (दौडगीर) येथे त्यांचे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे स्मारक उभारणार असल्याचे राजेंनी यावेळी घोषित केले. तसेच यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच नियोजित २ एकर जागेवर भव्य स्मारकाचे भूमिपूजन करू, असे प्रतिपादन यावेळी राजे साहेबांनी केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मरावबाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे नगराध्यक्षा रोजा करपेत, प्रकाश गुडेल्लीवार, बबलू हकीम, शाहीन हकीम, राहुल कलाटे, रमेश हलामी, पोलीस निरीक्षक मानभाव, प्रदीप सडमेक, भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, अमोल गुडेल्लीवार, पितांबर कुडमेथे, नगरसेवक विकास उईके, दशरथ कोरेत, संजय तोरे, विकास तोडसाम सहित जय पेरसापेन गोंड समाज बहूउद्देशीय मंडळ अहेरीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.