सायबर सुरक्षेसाठी जाणिव जागृती हाच उपाय : प्र. कुलगुरू डॉ. विजय चौबे

89

– नमाद महाविद्यालयात ‘स्टे सेफ ऑनलाइन’ मोहिमेचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया, २४ डिसेंबर २०२२ : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित वापर, डिजिटल पेमेंट आणि इंटरनेटच्या माहितीपूर्ण वापराबाबत विविध वापरकर्ता गटांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘स्टे सेफ ऑनलाइन मोहीम’ नावाची सायबर जागरूकता मोहीम डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत राबवणार आहे. यात प्रश्नमंजुषा, गटचर्चा इत्यादीद्वारे सायबर सुरक्षेवर नियमित कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात या मोहिमेची सुरुवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. विजय चौबे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली. सायबर सुरक्षेसाठी जाणिव आणि जागृती हाच एकमेव उपाय सद्याच्या घडीला उपलब्ध असून नागरिकांनी सायबर तंत्रज्ञाना बाबत सजग रहावे, असे आवाहन यावेळी डॉ. विजय चौबे यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेन्द्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, विधी विभाग, व्यवस्थापन विभाग आणि तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्टे सेफ ऑनलाइन मोहिमे अंतर्गत “सध्याच्या परिस्थितीत सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि गरज” या विषयावर चर्चासत्र नुकताच आयोजित करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरु विजय चौबे, तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. एस. यु. खान, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. गिरीष कुदळे व निशी चौबे उपस्थित होते. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्र. कुलगुरू डॉ. चौबे पुढे म्हणाले, सायबर तंत्रज्ञान महत्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत. मात्र आपल्या नागरिकांमध्ये या बाबतीत गांभीर्य नाही. सायबर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण शिक्षित होणे काळाची गरज आहे. सायबर तंत्रज्ञानामुळे घडणारे गुन्हे नोंदणी होण्याचे प्रमाण कमी आहे. सायबर तंत्रज्ञानातील होणारे गुन्हे हे आपली, आपल्या समाजाची अभिव्यक्ती आहे. पूर्वी हे गुन्हे सामान्य पातळीवर घडायचे आता सायबर तंत्रज्ञानाच्या पातळीवर घडतात. यावर आळा घालण्यासाठी सायबर तंत्रज्ञान आत्मसाथ करून आपली जाणिव जागृती घडविणे हे आपल्या हाती आहे, असे डॉ. चौबे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी सायबर तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या फसवणुकीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगून कुटुंबियांनी, मित्रांनी, समाजबांधवांनी आपुलकीचा हाथ द्यावा, असे आवाहन केले. सायबर तंत्रज्ञानामुळे आपण पत्रकार, संपादक झालो असलो तरी आपल्या भावनांवर आवर घालायला आपण शिकलो पाहिजे, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. यावेळी निशी चौबे यांनी समायोचित भाषण केले. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करभर देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अश्विनी दलाल, प्रास्ताविक डॉ. एस. यु. खान तर आभार डॉ. एच. पी. पारधी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.