– आ. भाई जयंत पाटील यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३० डिसेंबर २०२२ : सिरोंचा तालुक्यात मेडीगट्टा (medigatta) धरणासाठी अधिग्रहित केलेली पण भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झालेली शेतजमीन राज्य सरकार खरेदी करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या घोषणेमुळे धरणबाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तेलंगणाच्या मेडीगट्टा धरणासाठी सिरोंचा तालुक्यातील १२ गावातील धरणक्षेत्रात येणारी ३७३.८० हेक्टर जमीन सरकारने अधिग्रहित केली होती. त्यापैकी तत्काळ गरज असलेली २३४.९१ हेक्टर जमीन तेलंगणा सरकारने (telangana government) १०.५० लाख रुपये एकरप्रमाणे थेट खरेदी केली. त्यानंतर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु उर्वरित १३८.९१ हेक्टर अधिग्रहित जमिनीची (land) भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. धरणातील बॅक वॉटरमुळे (back water) या क्षेत्रातील पीक बाधित होत होते. याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही मिळत नव्हता. त्यामुळे शेतकरी (farmer) अडचणीत सापडले होते. याविरोधात १२ गावातील शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरू केले.
दरम्यान, शेकापचे आमदार जयंत पाटील (mla jayant patil) गड़चिरोली दौऱ्यावर (gadchiroli tour) असताना आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन हा प्रश्न समजावून सांगितला होता. गुरुवारी विधान परिषदेत जयंत पाटील यांनी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करीत शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली. चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन न झालेली शेतजमीन महाराष्ट्र सरकार (maharashtra goverment) खरेदी करेल व त्याचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी घोषणा केली. राज्य सरकारच्या घोषणेमुळे मेडीगट्टा धरणबाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.