सर्व सरकारी विभागांनी आपापसात ताळमेळ ठेवून महाराजस्व अभियान यशस्वी करावे : आमदार कृष्णा गजबे

90

– आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे महाराजस्व अभियान शिबिर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासकीय यंत्रणेतील गावपातळीवरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाण ठेऊन प्रामाणिकपणे गावातील प्रत्येकाला विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ देऊन, सर्व सरकारी विभागांनी आपापसात ताळमेळ ठेऊन महाराजस्व अभियान यशस्वी करावे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
ते आरमोरी तहसील कार्यालयाच्या वतीने जोगीसाखरा येथे जवाहर नेहरू शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या आजादी का अमृतमहोत्सव व महाराजस्व अभियान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्घघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे होते.तर प्रमुख अतिथी देसाईगंजचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी, हरिराम वरखडे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार संजय राठोड, माजी जि. प. सदस्या मनीषा दोनाडकर, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर, जवाहर नेहरू विद्यालयाचे संस्थापक हिरा मोटवानी, तालुका कृषी अधिकारी ज्योतसना घरत, वैद्यकीय अधिकारी धुमाळ, माजी पं. स. सदस्या वृंदा गजभिये, भाकरोंडीचे सरपंच विलास उसेंडी, किटाळीचे सरपंच राजेश लिंगायत, कवळू सहारे, ठाणेगावचे सरपंच वासुदेव मंडलवार, पळसगाव ग्रा.पं.चे सरपंच, ठाणेगावचे सरपंच मंडलवार, डोंगरसावंगी ग्रा.पं.च्या सरपंच सुलभा गेडाम, पिसेवडधाचे सरपंच प्रदीप कुमरे, कुलकुलीचे सरपंच विलास बावणे, सरपंचा भावेंद्र कंनाके, प्रवीण ठेंगरी, सतीश गुरनुले, ज्योती घुटके, करिश्मा मानकर, उदारांम दिघोरे, सोनी गरफडे, देवाशीष ढाली, दिलीप घोडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. गजबे म्हणाले की, वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबियांना वनविभागाकडून केवळ १५ लाख रुपयांची मदत केली जाते. ही मदत अल्पशी असून, बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार, तसेच शिधापत्रिका धारकांचा व धान्य खरेदीचा इष्टांक वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना उपविभागीय अधिकारी लोंढे म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्षम व्हावे.
महाराजस्व अभियानात महसूल प्रशासन, कृषी विभाग,आरोग्य विभाग, अन्न व पुरवठा विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत विभाग, सामाजिक वनीकरण, संजय गांधी निराधार, बँक, तसेच कोसा प्रकल्पातील आदी विभागांनी स्टॉल लावून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,संगनिकृत वनहक्क सातबारा, शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे, नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी धनादेश वाटप, रोटावेटर वाटप, दिव्यांग प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, बीपी एल, गोल्डन कार्ड, आधार कार्डचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी शिबिरात येणाऱ्या नागरिकांसाठी संस्थेच्या वतीने पाणपोई सुरू करून नागरिकांची तहान भागविली. या शिबिरात तालुक्यातील आदिवासी मुलींनी आदिवासी समूह नृत्य सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाला विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.