देशाची व शेतकऱ्यांंची सेवा करणारी संस्था म्हणजे श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्था : डॉ. नामदेवराव उसेंडी

83

– भाकरोंडी येथे कंगाला माझी सरकार जण जागरण परिषद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथे तीन दिवसीय श्री. मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्थेची परिषद भरवलेली होती. आंतरराष्ट्रीय समाजवाद संस्थेची स्थापना क्रांतीवीर हिरासी देव उर्फ कंगाला मांझी यांनी स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता सैनिक दल याच आधारावर श्री. मांझी समाजवाद संस्थेची स्थापना झालेली असून याचा मुख्य हेतु देशातील आदिवासींनी शेती करतानांच इतर फावल्या वेळात सैनिकी पोषाख धारण करुन देशात कुठल्याही भागात धार्मिक दंगे, दुष्काळ, पुर परिस्थिती, भूकंप आल्यास त्या ठिकाणी जावून सामान्य नागरिकांना मदत करणे, शातंता प्रस्तापित करणे हा उद्देश कंगला मांंझी सरकारचा आहे. या सैनिक संस्थेत सैनिकी व्यवस्थेप्रमाणे वेगवेगळे कॅडर असून त्यांना विशिष्ठ आजाद हिंद सेनेप्रमाणे पोषाख परिधान करण्याची मुभा आहे. या संघटनेला देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु, पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी या सैनिक संघटनेचे कार्याशी प्रभावीत होवून वेळोवेळी या संघटनेला प्रोत्साहित केलेले होते. या संघटनेचे देशात एकंदरीत 18 लाख नोंदणीकृत सदस्य असून सद्या परिस्थितीत 3 लाख सैनिक पोषाखधारी व सर्वसाधारण पोषाखधारी सक्रीय कार्यरत आहेत. या संघटनेच्या सद्याचे अध्यक्ष राजमाता श्रीमती फुलवादेवी कांगे असून त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळया आदिवासी भागात संघटन वाढविण्याचे काम करीत आहे. या संघटनेच्या माध्यमातुन आदिवासी भागातील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचार विरोधात शासनाकडे दाद मागण्याचा काम होत आहे. त्याप्रमाणे आदिवासी पंरपंरा, संस्कृती, धार्मीक विधी याची जोपासना करण्याची काम सुध्दा या संघटनेच्या मार्फतीने होत असते. या तीन दिवसीय सभेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार तथा महासचिव महा.प्रदेश काँँग्रेस कमिटी यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात बोलताना डाॅ. उसेंडी म्हणाले की, श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्था ही देशातील शेतकरी व नागरिक यांची सेवा करणारी संस्था असून देशामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी बहुमुल्य कार्य या संस्थे मार्फत केल्या जात आहे हे अतिशय अभिनंदनीय बाब आहे. सविधानिक मुल्य मानवी हक्क व अधिकार यांची जोपासणा करण्यासाठी या संघटनेचे गावागावात सदस्य होणे काळाची गरज असून सद्या देशात धर्म व्देष, वंश व्देष, जाती व्देष निर्माण करुन देशात अशांतता माजवण्याचे जे प्रकार आहेत त्याला आढा घालण्यासाठी मानवतेवर आधारीत समाजवादी सैनिक संस्था मजबुत करणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्षा राजमाता श्रीमती फुलवादेवी कांगे व यांचे सुपुत्र संघटनेचे उपाध्यक्ष कुमदेव कांगे, संस्थेच्या कायदेविषयक सल्लागार सु. श्री. राजकुमारी, ऍड. कांगे, सौ. यशोधरा उसेंडी, संस्थेचे सल्लागार श्री. उइके, गडचिरोली जिल्हयातील सैनिक दलाचे प्रमुख अंबरशहा दुग्गा, सचिव गणितराव पारसा, दलपत मडावी, सोमजी आतला, रामसिंग कल्लो आदी बहुसंख्येने उपस्थित होते.