महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघडे करण्याकरिता ४ एप्रिलला होणाऱ्या महाजनआक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भाजपा जिहा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे आवाहन

55

– भारतीय जनता पार्टी गडचिरोली तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची फंक्शन हॉल गडचिरोली येथे नियोजन बैठक

– ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात व सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात होणार महाजनआक्रोश मोर्चा व जाहीर सभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या ४ एप्रिल २०२२ च्या महाजनआक्रोश मोर्चा व जाहीर सभेला गडचिरोली तालुका व शहरातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी गडचिरोली तालुका व शहराच्या वतीने आयोजित मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीत केले आहे.

यावेळी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ भाजपा नेते रमेशजी भुरसे, मोर्चाचे तालुका संयोजक विलासजी भांडेकर, नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, महिला आघाडीच्या नेत्या रेखाताई डोळस, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजीताताई कोडापे, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, गडचिरोली महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविताताई उरकुडे, तालुका महामंत्री राजूभाऊ खंगार, लोमेश कोलते, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागरभाऊ कुभंरे, पंचायत समिती सदस्य शंकरजी नैताम, महामंत्री विनोद देवोजवार, सुरेश मांडवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रमोदजी पिपरे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून राज्यात सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज कापली जात आहे, २४ तास विजेची आवश्यकता असताना केवळ ८ तास नाममात्र वीज देऊन वारंवार खंडित केली जात आहे, राज्यात गुंडशाही ,दडपशाही महिलांवर अत्याचार सुरू आहेत. मात्र त्याकडे शासन गंभीर नाही. राज्यातील अनेक मंत्र्यांवर देशद्रोही व भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातील काही मंत्री जेलमध्ये आहेत आणि मंत्र्यांवर दहशतवाद्यांना पैसे दिल्याचेही गंभीर आरोप आहेत. परंतु त्यांना शासन निर्लज्जपणे समर्थन करीत आहे .या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेच्या मनातील हा महाजनआक्रोश असून या मोर्चाच्या निमित्ताने या महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघडे पाडायचे आहे त्याकरिता या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने सहभागी होवुन आघाडी सरकारप्रति आक्रोश व्यक्त करावा. त्याकरिता गडचिरोली शहरातील व तालुक्यातील महिला, मजूर, कामगार, शेतकरी, तरुण, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त जनतेने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सुध्दा ४ एप्रिल ला होणाऱ्या महा जनआक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.